Medicine Law Icon आरोग्य कायदा
वैद्यकीय उपचार, ग्राहक संरक्षण कायदा

Injections Side Effects डॉक्टरांकडूनही चुका होतात, पैकी काही निष्काळजीपणामुळे होतात. माणसाची जशी प्रगती होत आहे तसे वैद्यकीय उपचार, तपासण्या वगैरेंचा वापर वाढत जाणे साहजिक आहे. औषधोपचारांचे व वैद्यकीय हस्तक्षेपाचे काही वाईट परिणाम पण होऊ शकतात हे लक्षात ठेवले पाहिजे. यामुळे डॉक्टरी व्यवसायाबद्दलच्या तक्रारी वाढत आहेत. काही थोडया डॉक्टरांचा निष्काळजीपणा, पैसे उकळण्याची प्रवृत्ती यामुळे लोकमतही प्रतिकूल होत चालले आहे. ग्रामीण भागात तर आणखी अडचण आहे. ग्रामीण भागात नव्वद टक्के डॉक्टर्स ऍलोपथीची औषधे प्रशिक्षणाशिवायच वापरत असतात. रोगनिदानही फारसे केलेले नसते. अशा परिस्थितीत, दुसरा चांगला पर्याय नसताना लोकांना या संकटाला तोंड द्यावे लागते. कायद्यानुसार प्रशिक्षण नसताना औषधे वापरणे चूक आहे व त्याला शिक्षा होऊ शकते. आपण आता ग्राहक संरक्षण कायद्याबद्दल माहिती करून घेऊ या.

डॉक्टरांची चूक/निष्काळजीपणा/ औषधांचे दुष्परिणाम

औषधांचे दुष्परिणाम

नेहमी होणारे किंवा क्वचित होणारे दुष्परिणाम उदा. ऍस्पिरिनने अल्सरचा आजार वाढणे. असे परिणाम डॉक्टरच्या अपु-या ज्ञानामुळे झाले असतील किंवा निष्काळजीपणामुळे झाले असतील तर त्यासंबंधी तक्रार करता येते. पण सर्व काळजी घेऊनही अनपेक्षितपणे असे झाले तर त्याला दोष/चूक म्हणणे बरोबर नाही. कायदा ते चूक मानत नाही

अनपेक्षित घटना

वैद्यकीय व्यवहारात अनेक अनपेक्षित घटना घडू शकतात. उदा. बाळंतपणानंतर खूप रक्तस्त्राव होणे, भूल दिलेली असताना हृदयक्रिया बंद पडणे, शस्त्रक्रियेनंतर पू होणे इ. खूप काळजी घेऊन यांची शक्यता/प्रमाण कमी करता येते; पण त्या टळतीलच असे सांगता येत नाही. यामध्ये रुग्ण-डॉक्टरांची एकमेकांवर श्रध्दा व विश्वास असला तर पूर्ण माहिती दिल्यानंतर तक्रारी टळू शकतात. याबद्दल डॉक्टरांवरच जास्त जबाबदारी असते. कित्येक वेळा जाणूनबुजून असा धोका पत्करावा लागतो. उदाहरणार्थ, म्हाता-या माणसावर शस्त्रक्रिया करायची झाल्यास भूल देताना हृदयक्रिया बंद पडण्याचा धोका सदैव हजर असतो. शस्त्रक्रिया अटळ असेल (उदा. खुब्यांचा अस्थिभंग) तर हा धोका पत्करावाच लागतो. मात्र डॉक्टरने हे सर्व नातेवाईकांना नीट सांगितले पाहिजे.

अंदाज चुकणे

एखादा रोग डॉक्टरांना नीट समजला नाही, किंवा उपचार करताना अपेक्षित गोष्टी घडल्या नाहीत असे होऊ शकते. मात्र हा दोष मानता येणार नाही. पण अंदाज घेण्याची पध्दत अशास्त्रीय/ अपुरी असेल तर मात्र दोष येतो. समजा एखाद्या तापात सर्व तपासण्या करूनही निदान झाले नाही तर दोष देता येणार नाही. पण या तपासण्या न करताच रोग आहे असे म्हणता येणार नाही. तपासणी करणे ही डॉक्टरची जबाबदारी आहे. कधीकधी उपचार करताना/शस्त्रक्रिया करताना अपेक्षित यश मिळत नाही. असे झाले तर निर्णय करणे अवघड होते. उदा. एखाद्या आजारावर शस्त्रक्रिया करण्याच्या दोन पध्दती उपलब्ध असल्या व पैकी एक केल्यावर अपेक्षित यश मिळाले नाही तर दोष देता येईल काय? बहुधा नाही. मुख्यसूत्र असे की शास्त्रीयदृष्टया डॉक्टरने केले ते योग्य होते की नाही ह्या कसोटीवर सर्व उतरले पाहिजे. असे असेल तर परिणामांबद्दल दोष देता येणार नाही.

चुकीचे उपचार

अज्ञानाने/निष्काळजीपणे चुकीचे उपचार करणे हे अक्षम्य आहे. उदा. मलेरिया झाला असता क्लोरोक्वीन देण्याऐवजी पेनिसिलीन देणे हे गैर आहे. ग्रामीण भागातील डॉक्टरांच्या अज्ञानामुळे अशी अनेक उदाहरणे घडत असतात, कधीकधी यातून धोका होऊ शकतो व रुग्ण दगावूही शकतो. किंवा काही नुकसान होऊ शकते. रोगनिदान व औषधोपचार यांची नोंद ठेवण्याची पध्दत फारच जुजबी असल्याने आणखी अडचणी निर्माण होतात. चुकीच्या शस्त्रक्रिया क्वचितच घडतात; पण घडतात. रोगट अवयवावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी चांगल्या भागावर शस्त्रक्रिया झाल्याची उदाहरणे आपण वर्तमानपत्रात वाचतो.

रोगनिदान अपुरे किंवा चुकीचे करणे

धडधडीत चुकीचे रोगनिदान होणे, शास्त्रीय पध्दत न वापरता अशी चूक होणे हे मोठया प्रमाणात घडते. ग्रामीण भागात मलेरियाचे प्रमाण जास्त असूनही वेगळीच काही औषधे दिली जाण्याचा प्रकार नेहमी घडतो. (कारण चुकीचे निदान!) मेंदूसुजेचा ताप असताना केवळ ताप म्हणून उपचार करणे हाही असाच गंभीर प्रकार. असे प्रमाद घडावेत हे वैद्यकीय पेशाला शरमेचे आहे. ग्राहक चळवळीने आणि डॉक्टरांच्या संघटनांनी याबद्दल पुढाकार घेतला पाहिजे.

यावरून यात डॉक्टरचा दोष काय आणि काय नाही हे लक्षात येईल. ज्या चुकांमध्ये डॉक्टरचे अज्ञान किंवा निष्काळजीपणा दिसतो त्याबद्दल डॉक्टरांनी स्वतःहून जबाबदारी घेणे आवश्यक आहे, मात्र ज्यात त्यांचा असा दोष नाही त्याबद्दल ग्राहकांनी समजूतदारपणा दाखवणे आवश्यक आहे. दोष असेल तर समजून उमजून डॉक्टर व नातेवाईकांनी आपापसात नुकसानभरपाई समझोता केला पाहिजे. हे झाले नाही तर ग्राहक संरक्षण कायद्याखाली कारवाई करता येते.

खरे म्हणजे डॉक्टरी व्यवसायाचा दर्जा व समंजसपणा वाढणे हाच यावरचा खरा उपाय आहे. कोर्टकचे-यांनी एखाद्या प्रकरणात न्याय मिळेल पण एकूण व्यवसायावर त्याचा उलटाही परिणाम होऊ शकतो.

ग्राहक संरक्षण कायदा

सर्व खाजगी डॉक्टरांना ग्राहक संरक्षण कायदा लागू आहे. जवळ जवळ तीन चतुर्थांश रुग्ण खाजगी उपचार घेत असल्याने या कायद्याचा परिणाम एकूण वैद्यकीयक्षेत्रावर होणे साहजिक आहे. डॉक्टर, रुग्ण यांच्या दृष्टीने या कायद्याचा अर्थ काय आहे हे थोडे समजावून घेऊ या.

जे जे वैद्य/डॉक्टर व्यावसायिक पैसे घेऊन उपचार करतात त्यांना हा कायदा लागू आहे. एखाद्या वेळी अपवाद म्हणून त्यांनी मोफत उपचार केले तरी हा नियम लागू आहेच. मात्र जे उपचारासाठी कधीच पैसे घेत नाहीत त्यांना हा कायदा लागू नाही.

ज्यांना असे वाटते की डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे / हलगर्जीपणामुळे/चुकीने अज्ञानाने त्यांचे (किंवा नातेवाईकांचे) काही नुकसान झाले आहे, ते ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक न्यायालयात दाद मागू शकतात. पण दोष डॉक्टरचा आहे हे सिध्द करण्याची पूर्ण जबाबदारी तक्रार करणा-या व्यक्तीची असते. यासाठी जी कागदपत्रे लागतील ती (केस पेपर्स – रुग्ण नोंदी इ.) डॉक्टरने पुरवावीत असे बंधन आहे.

जर एखाद्याला ग्राहक कोर्टाकडे तक्रार करायची असेल तर –

संबंधित रुग्ण-नोंदी, केस पेपर्स, अहवाल इ. तक्रारीसोबत जोडावेत. यासाठी संबंधित डॉक्टरकडून/ रुग्णालयाकडून आवश्यक ते सहकार्य मिळणे बंधनकारक आहे.

दोन तज्ज्ञांनी, सदर प्रकरणात हलगर्जीपणा/चूक झाली आहे असा दाखला देणे आवश्यक आहे आणि ग्राहक कोर्टात साक्षीसाठी /उलटतपासणीसाठी त्यांनी हजर राहणे आवश्यक आहे.

घडलेल्या घटनेनंतर दोन वर्षांच्या आत तक्रार दाखल केली पाहिजे.

अर्जदाराने नेमके काय नुकसान झाले व नुकसानभरपाई किती पाहिजे हे अर्जात नमूद केले पाहिजे.

पाच लाखांपेक्षा कमी रकमेचा दावा जिल्हा ग्राहक कोर्टाकडे करावा, त्यापेक्षा जास्त पण वीस लाखांपेक्षा कमी दावा राज्य ग्राहक कोर्टाकडे करावा, आणि त्यापेक्षा मोठी रक्कम असल्यास राष्ट्रीय ग्राहक कोर्टाकडे तक्रार करावी.

ग्राहक कोर्टाकडे तक्रार दाखल करण्याआधी जवळपासच्या ग्राहक मंचाकडे शहानिशा करून घेतलेली बरी. या तक्रारीत तथ्य आहे की नाही याबद्दल ग्राहक मंच सल्ला देऊ शकेल. अशाने विनाकारण होणा-या केसेस व मन:स्ताप टळेल.

ग्राहक न्यायालयात कोर्ट फी भरावी लागत नाही, पण केस विनाकारण केली आहे असे ठरल्यास/ विरुध्द गेल्यास दहा हजार रुपये दंड भरावा लागतो.

ग्राहक संरक्षण कायद्यामुळे मोफत आणि लवकर न्याय मिळण्याची शक्यता वाढली आहे. पण त्याचबरोबर रुग्ण- डॉक्टर संबंध जास्त औपचारिक होणे, फी वगैरे वाढणे हा धोका आहेच. डॉक्टर मंडळींनी या कायद्याविरुध्द बरीच चळवळ केली आहे. पण ख-याखु-या तक्रारींना देखील न्याय मिळणे दुरापास्त झाल्याने अशी अवस्था ओढवली आहे. डॉक्टरांनी तयार केलेली कौन्सिल्स या दृष्टीने निरुपयोगी ठरल्याने कोर्टाचा हस्तक्षेप अनिवार्य ठरला आहे. ग्राहक मंचाने मात्र यात सुसंवाद राखण्याची महत्त्वाची भूमिका बजावणे आवश्यक आहे.

डॉक्टरजन्य आजार व धोके

प्रत्येक आरोग्य समस्येसाठी डॉक्टरी सल्ला व उपचार करून घेण्याची प्रवृत्ती वाढत आहे. पण वैद्यकीय सेवेच्या वाढत्या वापराबरोबर डॉक्टरजन्य- म्हणजे डॉक्टर, वैद्य, नर्स, इत्यादींच्या चुका, अज्ञान वा इतर कारणांमुळे आजारांचे प्रमाणही वाढत आहे. या आजारांमध्ये दोन गट पाडता येतील ते याप्रमाणे :

डॉक्टर, वैद्य, नर्स, इत्यादी उपचार करणा-यांच्या वैयक्तिक चुकांमुळे तयार होणारे आजार व धोके. (उदा. इंजेक्शनमुळे गळू, गाठ होणे, औषधांचा चुकीचा – अयोग्य वापर होणे.)
वैद्यकीय उपायांमधील अंगभूत दोष : उदा. औषधांमुळे काही लोकांना अपायकारक अनुभव येणे ; वावडे, रिऍक्शन, शस्त्रक्रियेनंतरचे काही परिणाम, इत्यादी.

या दोन्ही समस्यांबद्दल जनतेने आणि वैद्यकव्यवसायानेही सतत खबरदारी घेणे आवश्यक आहे. ग्रामीण जनतेच्या दृष्टीने तर ही समस्या फार मोठी आहे. कारण ग्रामीण भागातले बहुतांश डॉक्टर ऍलोपथीचे ज्ञान नसतानाही बहुशः ऍलोपथिक औषधे वापरतात. रोगनिदान, औषधयोजना व इतर दक्षता यांबद्दल तर ग्रामीण भागात फारच असमाधानकारक स्थिती आहे. यामुळे औषधांचा अंगचा दुष्परिणाम आणि डॉक्टरांचे अज्ञान व चुका या दोन्हींचा फटका बिचा-या रुग्णाला बसतो.

या समस्यांची मोठी यादी करीत बसण्यापेक्षा काही महत्त्वाची उदाहरणे देऊन जनमत तयार करण्याइतकी माहिती देणे जास्त योग्य होईल. काही नेहमी आढळणा-या समस्या पुढे दिल्या आहेत.

  • रोगनिदान न करता प्रतिजैविक औषधांचा मारा करणे. अनेक प्रतिजैविक औषधांचे काहीजणांमध्ये तरी दूरगामी दुष्परिणाम होतात. उदा. मुलांमध्ये टेट्रा या औषधाने दात कायमचे पिवळे पडतात. पेनिसिलिनने कधीकधी रिऍक्शन येते.
  • इतरही अनेक औषधांचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यांची यादी फार मोठी आहे. इथे त्याची गरजही नाही. मात्र गरज वाटल्यास वेबसाईटवर ही माहिती मिळू शकते.
  • इंजेक्शन देताना योग्य काळजी न घेतल्याने (निर्जंतुकता न पाळल्यामुळे) गळू होणे किंवा दंडातली नस जखमी होऊन हात लुळा पडणे इत्यादी.
  • फारसा त्रास नसताना टॉन्सिल, ऍपेंडिक्स, गर्भाशय इत्यादी काढून टाकणे.
  • गरोदरपणात अनेक औषधांचा गर्भावर दुष्परिणाम होतो. उदा. स्टेरॉईडमुळे गर्भाच्या तोंडातला टाळा दुभंगणे इत्यादी. गरोदरपणात औषधे देणे धोक्याचेच आहे, निवडक औषधेच दिली पाहिजेत.
  • शस्त्रक्रियेनंतरचे अनेक दुष्परिणाम – दूषित जखमा, रक्तस्त्राव, नवीन दुखणी तयार होणे, इत्यादी.
  • तोंडाने घ्यायच्या गर्भनिरोधक गोळयांनी काही स्त्रियांमध्ये अनेक प्रकारचे दुष्परिणाम निर्माण होतात (रक्तदाब वाढणे, वजन वाढणे, गर्भावर परिणाम, पित्ताशयसूज, काही प्रकारचे कर्करोग वाढणे इ.) यासंबंधी खूप काळजी घेणे व चिकित्सा होणे आवश्यक आहे.
    स्टेरॉईड औषधांनी जठरव्रण, मधुमेह, इत्यादी वाढतात.
  • हाडवैद्यांनी चुकीची उपाययोजना केल्याने हाड न जुळणे, वाकडेपणा येणे, इत्यादी.
  • क्षयरोग, मधुमेह, अति रक्तदाब इत्यादी आजार वेळीच न ओळखता निरर्थक उपचारात कालहरण करणे.

हे डॉक्टरजन्य आजार होऊ नयेत म्हणून

वैद्यकीय विज्ञान अधिकाधिक व्यापक व सुरक्षित करणे, डॉक्टरवर्गाने योग्य ती पूर्ण काळजी घेणे व प्रशिक्षण सुधारणे, लोकांनी जागरूक राहून अक्षम्य चुकांविरुध्द संघर्ष करणे, या तीनही आघाडयांवर प्रयत्न होणे आवश्यक आहे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.